Conservation of Nature Essay in Marathi |Conservation of Nature Nibandh
“मुलांनो हे जे १०० मजली सायन्स सेंटर तुम्ही पहात आहात हा विज्ञानाचा आणि मानवाने बनवलेल्या असंख्य अजब यंत्रांचा एक नमुना आहे. काही वर्षांपुर्वी ह्या ठिकाणी उंचच उंच जंगल आणि खडकाळ टेकड्या होत्या”, गुरुजी आम्हाला सांगत होते. एका दृष्टीने हा खरचं एक करिष्मा होता पण त्यासाठी आपण काय गमावलं आहे ह्याची जाणीव कित्ती लोकांना आहे? ही जंगी इमारत उभारण्यासाठी कित्तेक झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली. उंचच उंच टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इमारतीचा पाया घट्ट करण्यासाठी जमीनीच्या आतपर्यंत खोदकाम करुन आपण लोखंडी बार उभारले. आणि हे असे प्रकार ह्या एकाच ठिकाणी नाहीत तर जगभर चालु आहेत. कित्ती मोठ्ठ्या प्रमाणात मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.
कधी रस्ता रुंदीकरणासाठी, कधी वाढत्या शहरीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी उभारलेली सिमेंटची जंगलं, तर कधी केवळ पैश्यासाठी चंदनासारख्या झाडाची वृक्षतोड आणि चोरी अशी अगदी आपल्या जवळपास घडणारी उदाहरणं देता येतील.
इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे, “देअर इज अ ऍक्शन फॉर एव्हरी रिऍक्शन”, ह्या उक्तीप्रमाणे कधीना कधी निसर्ग हे अतिक्रमण झुगारुन देणार हे निश्चीत. सुनामी, भुकंप, ज्वालामुखींचा उद्रेक, बदलते पर्जन्यमान आणि त्यानुसार बदलणारे निसर्गाचे हवामानचक्र हे त्याचेच प्रतिक आहे.
मनुष्य कितीही प्रगत झाला तरी आजही त्याचे जिवनमान निसर्गावरच अवलंबुन आहे. निसर्गाच्या छोटासा प्रकोप सुध्दा आपले जिवन हलवुन टाकु शकतो. मनुष्य आजही नैसर्गीक आपत्तींसमोर ठेंगणा आहे, हतबल आहे.
नुकताच ‘२०१२’ नामक एक हॉलीवुडपट येऊन गेला ज्यामध्ये २०१२ साली पृथ्वी नष्ट होणार असल्याचा निर्वाणा देण्यात आला होता. त्या एका चित्रपटाने सुध्दा अनेक लोकांची मन भितीनी थरथरली होती. अनेक शंका-कुशंका, अफवांना उधाण आले होते. शेवटी ‘नासा’ने ह्या बातमीमध्ये तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला तेंव्हा कुठे सर्व शांत झाले. थोड्याकाळासाठी का होईना खडबडुन जागे झालेले मानवी जिवन पुन्हा जाणिवपुर्वक ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु लागले.
‘ग्लोबल वॉर्मींग’कडे लक्ष वेधण्यासाठी कधी बर्फमय शिखरांवर तर कधी समुद्राच्या तळाशी अनेक मिटींग्स झडल्या, परंतु त्या तितक्याश्या परीणाम साधु शकल्या नाहीत.
आजही तितकेच, किंवा त्याहुनही अधीक कारखाने, मोठ मोठ्या कंपन्या हवामान, पाणी, परिसर प्रदुषणाने भारुन टाकत आहेत. आजही ‘गो ग्रिन’ चा नारा लगावण्यासाठी आपण कित्तेक लिटर इंधन खर्च करत, हवेतील कार्बन चे प्रमाण वाढवत वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर करतो आहेच. आजही स्वार्थासाठी निसर्गाची कत्तल चालु आहे.
समुद्रपातळी वाढते आहे, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळतो आहे, पृथ्वीभोवतालचा ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी कमी होत आहे, हवामानात लक्षणीय बदल होत आहेत, पण इथे स्वार्थाची झापडं लावलेल्या अतीहुशार अश्या मानव-प्राण्याला त्याचे काय? जोपर्यंत प्रश्न समोर ‘आ’ वासुन उभा ठाकत नाही, तो पर्यंत त्याचा कश्याला विचार करायचा? आणि निसर्गाचा प्रकोप झालाच तरी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे तात्काळ कुठला-ना-कुठला देश त्यावर मार्ग शोधुन काढेल ह्या विचारातच आपण मग्न आहोत.
निसर्गाचे संवर्धन होणे आवश्यक आहे असे पोटतिडकिने ओरडणाऱ्या चार लोकांची तोंड दाबली जात आहेत. तुम्ही जसे आनंदाने आयुष्य जगलात तसेच आयुष्य जगण्याचा आम्हा मुलांचा आणि आमच्या पुढील पिढीचाही हक्क आहे, हे का तुम्ही लक्षात नाही घेत आहात?
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा निसर्गाचे संवर्धन वर निबंध (Conservation of Nature Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Conservation of Nature Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा निसर्गाचे संवर्धन वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.