Gautama Buddha Essay in Marathi |Gautama Buddha Nibandh
बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम पाली. बुद्ध धर्माचे संस्थापक. सिद्धार्थाचे जन्मस्थळ- लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध धर्मीय वाङमय नुसार, त्याचा पिता राजा शुद्धोदन शाक्य या कोशल प्रांतात निवास करणारा राजा होता. लोक कथेनुसार शुद्धोदन हा सूर्यवंशीय इक्ष्वाकू घराण्याचा वंशज हेता. राजा शुद्धोदनाची पत्नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. सिद्धार्थ जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निर्वाण झाले. बाळाचे नांव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. त्याची जीवनकहाणी, त्याची प्रवचने, आणि त्याने घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून अनुयायांनी त्याच्या महापारीनिर्वाणानंतर संकलित केले आणि मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केले . गौतमबुद्धाच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुक पाठांतराद्वारे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सुपूर्द होत गेला.त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मत:च प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – महापजापती गौतमीने पोटच्या पोरा प्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजांतवैभव आणि राज सुलभ अशा सुख वैभवाचा जणी कांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केलेला होता. सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग त्याने बांधलेला होता. “महान योगी” होण्यापासून रोखण्यासाठी, दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये , धार्मिक वा अध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ आकांक्षा होती. सोळावे वर्ष प्राप्त झाल्यावर शुद्धोदनाने त्याचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्नी, राजस पुत्र. सौख्यास कांहीही कमी नाही अशी २९ वर्षे सिद्धार्थाचे आयुष्य पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत गतिमान होते परंतु युवराज सिद्धार्थ गौतम आपले केशकर्तन करून योगी बनले.
एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या – चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या मर्यादित जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपलं सुख हा अपवाद आहे आणि जग दु:खात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला आणि एक संन्यासी त्याने पाहिला त्याची झोप उडाली, सुखात मन रमेना झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते, पति म्हणून अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राज वाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंथक नामक घोड्यासह उभा होता. देवगणांनी कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खुर कापडात बांधले होते.
सिद्धार्थ गौतम विषयीच्या महितीचा मुख्य स्त्रोत म्हणजे बौद्ध वाङमय. बुद्ध आणि त्याचे अनुयायी प्रत्येक वर्षी चार महिने त्याच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि मग एका शतकानंतर, अनुयायांनी एक बौद्ध धम्म परिषद बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. या संसदेतील, कांही नियमांनुसार, हे साधु बुद्ध जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधु कडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, मौखिक जतनाने हा ऐतिहासिक ठेवा पिढ्यानुपिढ्या पुढे चालत राहिला. उपलब्ध पुराव्या नुसार, दुसऱ्या संसद दरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धाची शिकवण लेखी रुपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली. एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, बुद्ध जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदी ऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींनुसार तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार ज्या भागात झाला ते गंगा नदीचे खोरे, ह्याच भागात गौतम बुद्धांनी आपले प्रारंभिक भ्रमण केले.
सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाचा राजा बिंबिसारा याच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.
ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरुंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांस ही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला.
सिद्धार्थ आणि इतर पाच सह संन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्न पाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरूवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला. सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करुनच आत्मबोध होउ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ(पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले की, सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर , वयाच्या ३५ व्या वर्षी बोधीवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली इथून पुढे त्यांना बुद्ध म्हटले जाऊ लागले.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा गौतम बुद्ध वर निबंध (Gautama Buddha Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Gautama Buddha Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा गौतम बुद्ध वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.