मराठी भाषेचा इतिहास वर निबंध | History of Marathi language Essay in Marathi

History of Marathi language Essay in Marathi |History of Marathi language Nibandh

मराठी भाषा हि इंडो-आर्यन कुटुंबातील मानली जाते. साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख ७९५ सी.ई. चे मानले जातात. असेच काही शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी तालुक्यात सापडले जे १०१२ सी.ई. चे मानले जातात. दिवे इथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे १०६० किंवा १०८६ सी.ई. चे आहेत. याचा अर्थ असा कि मराठी हि १२व्या शतकापर्यंत एक अधिकृत लिखित भाषा झाली होती.

यादव काळ

११८७ सी.ई. नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्य शतकाच्या शेवटी पर्यंत मराठी वर्णलेखनाची प्रमुख भाषा झाली होती. असे मानले जाते कि यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते.

पुढे मराठी भाषेचा प्रसार महानुभाव आणि वारकरी पंथांमुळे झाला. यांनी आपल्या धर्माचा आणि शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला. सेउण राज्याच्या काळात मराठी भाषा न्यायालयात सुद्धा वापरली जाऊ लागली. यादव राजवटीतील शेवटच्या तीन राज्यांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांत वर मराठी साहित्य गद्य आणि काव्य रूपात तयार करण्यात आले.

मराठीतील र्वात जुने गद्य पुस्तक हे “विवेकसिंधु” मानले जाते, जे मुकुंदराज यांनी लिहिले. मुकुंदराज हे एक नाथ योगी होते, ते त्या काळातील अग्रगण्य कवी होते. मुकुंदराजांनी शंकराचार्यांच्या कथन आणि शिकवणींवरून हिंदू तत्वज्ञान आणि योग मार्ग यांच्या मूलभूत सिद्धान्तांचे वर्णन केले. मुकुंदराजांचा “परमात्म” ग्रंथ मराठी भाषेत वेदांत स्पष्ट करण्याचा पहिला पद्धतशीर प्रयत्न समजला जातो.

पुढे १२३८ मध्ये माहीमभट्ट यांनी “लीळाचरित्र” लिहिले, हे महानुभाव पंथातील चक्रधर स्वामी यांचे आत्मवृत्त होते. पुढे माहीमभट्ट यांनी चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंदप्रभू यांचे आत्मवृत्त “गोविंदप्रभूचरित्र” लिहिले. महानुभाव संप्रदायाने धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी मराठीला वाहन बनवले. महानुभाव साहित्यात साधारणपणे देवतांच्या अवतारांचे वर्णन, संप्रदायाचा इतिहास, भगवद्गीतावरील टीका, श्रीकृष्ण भगवानांच्या कथा आणि व्याकरणाचे वर्णन करण्यात आले.

मध्ययुगीन आणि डेक्कन सल्तनत कालावधी

१३ व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला. त्यांचे समकालीन, संत नामदेव यांनी मराठीत तसेच हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. मुकुंदराज हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध कवी होते,त्यांनी “विवेक-सिद्धी” आणि “परममित्र ” ग्रंथ लिहिले जे पौराणिक वेदांताशी संबंधित आहेत. १६ व्या शतकात संतकवी एकनाथ यांनी “एकनाथी भागवत” लिहिले जे भागवत पुराणावरील भाष्य आहे. तसेच संत एकनाथांनी भारुडे सुद्धा लिहिले जी आजच्या काळातही प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली. संत तुकाराम यांनी सुमारे ३००० अभंग लिहिले.

सल्तनत काळातही मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. या काळात जरी शासक मुस्लिम होते, तरी स्थानिक जमीनदार, महसूल अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदूच होती. यामुळे मराठीचा वापर व्यवहारात करण्यात आला. या काळात खूप सारे पर्शिअन शब्द मराठीमध्ये प्रचलित झाले, जसे बाग, शहर, कारखाना, बाजार, कागद, हुशार, जमीन, खुर्ची, हजार, जाहिरात आदी. हे शब्द आजही मराठीमध्ये वापरले जातात.

मराठा साम्राज्य

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे.

१८ व्या शतकात, पेशवा काळात खूप मराठी साहित्य लिहिले गेले. यातील काळातील प्रसिद्ध काम म्हणजे वामन पंडित यांचे “यथार्थदीपिका”,रघुनाथ पंडित यांचे “नळदमयंती स्वयंवर”. या काळात नवीन साहित्यिक प्रकारचा प्रयोग करण्यात आला. संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांनी “ओवी” प्रकार निर्माण केला. त्यांनी महाभारत आणि रामायणाचे मराठी भाषांतर ही केले. याच काळात “पोवाडा” आणि “लावणी” प्रकारचा उगम झाला. अनंत फंदी, राम जोशी आणि होनाजी बाळा यांनी पोवाडा आणि लावणी प्रसिद्ध केले.

ब्रिटिश राज कालावधी

१९व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बायबल चे मराठी भाषांतरही केले. साल १८३१ मध्ये कॅप्टन जेम्स थॉमस मॉलवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश (डिक्शनरी) संकलित केला. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण”सुरु केले. याच काळात संगीत नाटक ही विकसित झाले. मराठी नाटकाच्या प्रसिद्धीमुळे मराठीचा विस्तार झाला. आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसुत यांनी आपली पहिली कविता १८८५ मध्ये प्रकाशित केली.

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरु केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. २०व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला. मराठी साहित्य,नाटक, चित्रपट यांनी मराठी भाषा आणखी विस्तारली. एन.के. केळकर यांचे जीवनचरित्र लेखन, हरि नारायण आपटे, नारायण सीताराम फडके आणि व्ही. एस. खांडेकर यांचे कादंबरी, विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी साहित्य आणि मामा वरेरकर आणि किर्लोस्कर यांची नाटके यांनी मराठी भाषा समृद्ध केली.

भारतीय स्वातंत्र्यानंतर

भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठीला घटना दुरुस्ती (आर्टिकल) ३४४(१) आणि ३५१ नुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला. १९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. आताच्या सुधारणेनुसार कोंकणी, मणीपुरी, सिंधी, आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही २२ झाली. मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. यासाठी मागील दोन दशक प्रयत्न केले जाते आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यानी भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे तसा अर्ज भरला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषा ठरवण्यासाठी काही अटी असतात. त्या म्हणजे ती भाषा प्राचीन असावी (१५०० ते २००० वर्ष जुनी), प्राचीन आणि मूळ साहित्य हवे इत्यादी. संस्कृत, तेलुगू, तमिळ,कन्‍नड,ओडिया, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा अंदाज आहे.

१ मे १९६० मध्ये विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आले. हे एकत्रीकरण भाषेच्या आधारावर झाले होते. राज्य आणि सांस्कृतिक संरक्षणामुळे ९० च्या दशकात मराठीभाषेची खूप प्रगती झाली. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटक संमेलन आयोजित केले जाते. तसेच दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात जसे “सवाई गंधर्व” इत्यादी जे मराठी कला, संगीत, संस्कृती आणि भाषेचा गौरव करतात. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत उल्लेखनीय कार्ये झाली, यात प्रमुख वाटा होता तो म्हणजे खांडेकर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, पी.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि आणखी खूप साहित्यिक, कलाकारांचा.

२१ वे शतक

२१ व्या शतकात व्यावहारिक फायद्यांमुळे इंग्रजीला खूप महत्व प्राप्त झाले. इंग्रजी भाषा सरकार सुद्धा व्यवहारासाठी वापरते. जागतिकारणामुळे इंग्रजीची मागणी वाढली. आता अशे दिसून येते कि शहरी भागातील पालक मुलांना इंग्रजी शाळेंत भरती करतात त्यामुळे हळू हळू मराठीचा ऱ्हास होऊ शकतो असे मानले जाते. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, वर्तमानपत्रे हे आजच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्यात आपली जबाबदारी बजावत आहे.

निष्कर्ष

मराठी हि एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा मराठी भाषेचा इतिहास वर निबंध (History of Marathi language Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा History of Marathi language Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा मराठी भाषेचा इतिहास वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment