माझी आई – 2 वर निबंध | My mother – 2 Essay in Marathi | My mother – 2 Nibandh

My mother – 2 Essay in Marathi |My mother – 2 Nibandh

आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य कमी पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही.” माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्‍यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्‍येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, ‘न ऋण जन्मदेचे फिटे.’ माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या ‘करीअर’चा कधीच विचार केला नाही.

ती स्वतः एम्. एस्सी.(M.Sc) असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी.(Ph.D) केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती. माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.

खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.’

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, ‘एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.’ आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई.” खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा माझी आई – 2 वर निबंध (My mother – 2 Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा My mother – 2 Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा माझी आई – 2 वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment